नीचपण बरवे देवा

अभंगवाणी नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही दावा ।। महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ।। येता सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ।। तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ।। हे देवा, लहानपण, हलकेपणच मला फार चांगले वाटते. कारण लहानपणाचा कुणीही मत्सर करीत नाही, कुणी हेवा दावा साधित नाही. ।।१।। पाहा ना, नदीला महापूर आला तर मोठमोठी झाडे वाहून जातात, मोडून पडतात; पण नम्रपणाने पाण्याखाली वाकणारे लव्हाळ्याचे गवत मात्र वाचते. ।।२।। सागराच्या मोठमोठ्या लाटा जरी उसळल्या तरी त्याच्या पुढे नम्र होतात त्या त्याच्या पाठीवरून जातील व त्यांच्या जिविताचे रक्षण होईल. ।।३।। तुकाराम महाराज म्हणतात सर्वात खाली असणारे पाय मनोभावे धरल्यास मोठ मोठ्या बलवान मानसाचेही मग काही चालत नाही, असे नम्र होण्यातील वर्म आहे. ।।४।।