चिरंजीवपद
।। हरी ॐ तत्सत ।।
संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजकृत
संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजकृत
।। सार्थ चिरंजीवपद ।।
(साधकांना धोक्याची सूचना)
चिरंजीव पद पावावयासी ।
अधिकार कैसा साधकासी ।
किंचित बोलेन निश्चयेंसी ।
कळावयासी साधका ॥१॥
"चिरंजीवपद" म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।।
आधीं पाहिजे अनुताप ।
तयासें कैसें स्वरुप ।
नित्य मृत्यु जाणे समीप ।
न मनीं अल्प देह सुख ॥२॥
यात मुख्यतः 'अनुताप' (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।।
म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला ।
तो म्यां विषय भोगी लाविला ।
थिता परमार्थ हातीचा गेला ।
करीं वहिला विचार ॥३॥
तो म्हणतो, देवाने हा उत्कृष्ट नरदेह दिला असता विषय सेवनाकडे मी त्याचा दुरुपयोग केला आणि हातचा परमार्थ घालवून बसलो.
असा तो विचार करतो. ।।३।।
ऐसा अनुताप वाहती चित्तां ।
वेराग्यं ये त्याचिये हातां ।
वैराग्या्ची कथा ।
किंचित आतां पै बोले ॥४॥
असा अनुताप नित्य करू लागला म्हणजे त्यास 'वैराग्य' प्राप्त होते. त्या वैराग्याची कथा (स्वरूप) सांगतो, ऐक. ।।४।।
तें वैराग्या बहुतांपरी ।
आहे गा तूं अवधारीं ।
सात्विक राजस तामस त्रिप्रकारी ।
योगेश्वरी बोलिजे ।।५॥
ते वैराग्य अनेक प्रकारचे असते, त्यात योगीश्वरांनी = (सर्व श्रेष्ठ अनुभव जाणकारांनी) सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकार सांगितले आहेत. ।।५।।
नेणें वेधविध विचार ।
नाहीं सत्संग सधर ।
कर्मभ्रष्ट साचार ।
तो अपवित्र तामस ॥६॥
वेधविधी, आचार-विचार, सत्कर्म इत्यादी ज्याला माहीत नाही. कर्मधर्मात जो भ्रष्टाचार करतो, तो पुरुष ते वैराग्य 'तामस' म्हणजे अपवित्र होय. ।।६।।
त्याग केला पूज्यतेकारणें ।
सत्संग सोडूनि पूज्यता भोगणें ।
शिष्या ममता धरुन राहणें ।
तो जाणणें राजस ॥७॥
लोकांनी आपल्या नादी लागून पूजा करावी ह्या हेतूने (बाह्यतः) त्याग करणे व सत्संग सोडून पूजा घेणे, आणि (शिष्यांकरिता आपलेपणा)धरून राहणे. हे 'राजस' वैराग्य समजावे. ।।७।।
ऐसें वैराग्य राजस तामस ।
तो त्याग न माने संतास ।
तेने भेटे कृष्ण परेश ।
अनर्थासी मूळ हें ॥८॥
असले राजस व तामस वैराग्य संतांना मान्य नाही. कारण त्यायोगे श्रीकृष्ण परमात्मा भेटत नाही. उलट ते अनार्थस कारण होते. ।।८।।
आतां वैराग्य शुध्द सात्विक ।
जे जगद्वंद्य मानी यदुनायक ।
तें तूं सविस्तर ऐक ।
मनीं निष्टंक बैसावया ॥९॥
आता शुद्ध सात्विक वैराग्य, जे मी यदुनायक जगतवंद्य मानतो. ते सविस्तर सांगतो. मनास नीट ठसण्याकरिता लक्ष देऊन ऐक. ।।९।।
भोगेच्छा विषयिक ।
ते तो सांडी सकळिक ।
प्रारब्धें प्राप्ता होतां देख ।
तेथुनि निष्टंक मन काढी ॥१०॥
विषयाची सर्व भोगेच्छा तो टाकून देतो. प्रारब्धानुसार भोग प्राप्त झाले तरी त्यातून अंग काढून घेतो. (लिप्त होऊन राहत नाही). ।।१०।।
विषय पांच आहाती ।
ते अवश्य साधका नाडिती ।
म्हणोनी लागों न द्यावी प्रीती ।
कोणे रीती तें ऐक ॥११॥
कारण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे पाच विषय आहेत, ते साधकांना नाडतात, म्हणून त्याची प्रीती तो लावून घेत नाही. ते कसे ते सांगतो ऐक. ।।११।।
जेणें धरिला शुध्द परमार्थ ।
त्यासी जनमान हा अनर्थ ।
तेणे वाढे विषय स्वा्र्थ ।
ऐका नेमस्त विचार ॥१२॥
ज्याने शुद्ध परमार्थ मार्ग धरला, त्याला जनमान=(लोकांनी नावाजने) हा अनर्थ कारक आहे. कारण त्यायोगे विषय स्वार्थ वाढत असतो, तो नेमस्त =( नेमका विचार करून ठरलेला मार्ग) ऐक. ।।१२।।
वैराग्य पुरुष देखुनी ।
त्याची स्तुती करती जनीं ।
एक सन्मानें करुनी ।
पूजेलागूनि पैं नेती ॥१३॥
विरक्त पुरुष पाहून लोक त्याची स्तुती करू लागतात, कोणी त्याला मोठ्या सन्मानाने पूजेसाठी नेतात. ।।१३।।
तंव त्या्चे वैराग्य कोमळ कंटक ।
नेट न धरी निष्टंक ।
देखोनि मान स्तुती अलौकिक ।
भुलला देख पैं तेथें ॥१४॥
त्याचे वैराग्य कोवळ्या काट्या सारखे लवचिक असल्यामुळे नेट धरू शकत नाही, अलौकिक मान व स्तुती पाहून तो तेथे भुलून जातो. ।।१४।।
जनस्तुती लागे मधुर ।
म्हणती हा उध्दरावया हरीचा अवतार ।
आम्हांलागी जाहला स्थीर ।
धरी अपार शब्देगोडी ॥१५॥
जगद्उद्धाराकरीता हा हरीचा अवतार असून आमच्याकरिता येथे स्थिर झाला आहे. इत्यादीजण स्तुतीचे शब्द त्याला गोड वाटू लागतात, त्यायोगे तो 'शब्द' गोडी धरतो. (ते गोड लागतात म्हणून तो अडकतो.) ।।१५।।
हा पांच विषयांमाजीं प्रथम ।
शब्द विषय उपक्रम ।
मग स्पर्श विषय संभ्रम ।
झोंबे परम त्या् कैसा ॥१६॥
पाच विषयामध्ये 'शब्द' हा पहिला विषय होय, त्या नंतर स्पर्श विषय त्याला सुगम होतो तो उपक्रम ऎक. ।।१६।।
नाना मृदु आसनें घालिती ।
विचित्र पर्यंक निद्रेप्रती ।
नरनारी आंग शुश्रुषा करिती ।
तेणें धरी प्रीती स्पर्शाची ॥१७॥
बसायला लोड,तक्के, गाद्या वगैरे मऊ आसने घालतात, निजायला छप्पर पलंग वगैरे देतात आणि नरनारी शुश्रूषा= सेवा करायला लागतात, त्यायोगे तो 'स्पर्श' गोडी धरतो. ।।१७।।
रुप विषय कैसा गोंवी ।
वस्त्रें भूषणें देती बरवी ।
तेणें सौंदर्य करी जीवीं ।
देहभावे श्लाघ्यता ॥१८॥
आता 'रूप' विषय कसा गोवतो ते पहा.
त्याला चांगली चांगली वस्त्र व अलंकार देतात.
त्यायोगे देहाच्या सौंदर्यात तो गुरफटतो.
देहभावात श्लाघ्यता (मोठेपणा, डौल, थोरवी) मानतो.
यामुळे देहाबद्दल मोठेपणा उत्पन्न होतो व वाढतो. ।।१८।।
रुप विषय ऐसा जडला ।
मग रस विषय कैसा झोंबला ।
जैसें आवडे तें त्याला ।
गोड गोड अर्पिती ॥१९॥
या प्रमाणे 'रूप' विषय त्याला जडतो. त्यानंतर 'रस' विषय कसा झोम्बतो पहा. जे जे खाणे आवडते, तसले पदार्थ त्याला खावयाला देतात. ।।१९।।
ते रस गोडी करितां ।
घडी न विसंबें धरी ममता ।
मग गंध विषय ओढीता ।
होय तत्वतां त्याग कैसा ॥२०॥
त्या रसगोडीमुळे तो त्या भक्तांना घडीभरही न विसंबत त्यांची ममता धरून राहतो ! त्यानंतर 'गंध' विषय त्याला कसा ओढतो ते पहा. ।।२०।।
आवडे सुमन चंदन ।
बुका केंशर विलेपन ।
ऐसें पांचही विषय संपूर्ण ।
जडले जाण सन्मानें ॥२१॥
त्याला अत्तर, गुलाब, बुका, केशराची उटी इत्यादी लावतात. याप्रमाणे पाचही विषय सन्मानाने जडून राहतात.! ते सन्मानाने (मिळतात) त्यांचे बरोबर मानही मिळतो. ।।२१।।
मग जे जे जन वंदिती ।
तेवी त्याची निंदा करिती ।
परी अनुताप नुपजे चित्तीं ।
ममता निश्चिती पूजकाची ॥२२॥
असे झाले म्हणजे पूर्वी जे जे लोक वंदन करीत असत, ते ते नंतर निंदा करू लागतात ! परंतु चित्तात अनुताप उत्पन्न होत नाही, कारण त्याला पूजकाची ममता लागून राहिलेली असते. ।।२२।।
म्हणाल जो विवेकी आहे ।
त्यासी जनमान करील काय ।
हें बोलणें मुर्खाचे पाहे ।
तया चाड आहे मानाची ॥२३॥
कोणी म्हणतील, जो विवेकी असतो त्याला जनमान( लोकांकडून मिळणारा मोठेपणा) कसा बाधा करील? परंतु हे बोलणे मूर्खाचे होय, ज्याला मानाची गोडी असते. (तोच असे म्हणेल.) ।।२३।।
ज्ञात्यासी प्रारब्ध गती ।
मान झाला तरी नेघो म्हणती ।
तेथेंचि गुंतोनी न राहती ।
उदास होती तात्काळ ॥२४॥
ज्ञात्याला = (विवेकी पुरुषाला) प्रारब्ध गतीने मान प्राप्त झाला तरी (देणार्याच्या संतोषाकरिता) नको म्हणत नाहीत, परंतु त्यातच ते गुंतून राहत नाही, लगेच उदास होतात. ।।२४।।
यापरी साधकाच्या चित्ता ।
मान न सोडी सर्वथा ।
जरी कृपा उपजेल भगवंता ।
परी होय मागुता विरक्ता ॥२५॥
याप्रमाणे साधकाच्या चित्ताला मानाची गोडी सोडवत नाही. भगवंताला कृपा उत्पन्न होईल, तरच तो पुन्हा विरक्त होईल. ।।२५।।
तो विरक्त कैसा म्हणाल ।
जो मानलें सांडी स्थळ ।
सत्संगीं राहे निश्चळ ।
न करी तळमळ मानाची ॥२६॥
तो विरक्त कसा वागतो म्हणाल, तर जिकडे मान-पान होतो, ते ठिकाण सोडून मनाची तळमळ टाकून देऊन तो सत्संगात राहू लागतो. ।।२६।।
ऐसा परमार्थ साधकासी ।
जन मान्यता विघ्न त्यासी ।
तेणें लुब्धा विषयासी ।
या चिन्हासी बोलिजे ।।२७॥
साधक असा परमार्थ करीत असतांना जनमान (लोकांकडून) ज्या विषयाचे विघ्न येतात, त्याचीच खूण आता सांगेन. ।।२७।।
मांडीना स्वतंत्र फड ।
अंगी येईल अहंता वाड ।
न धरी जीवीकेची चाड ।
न बोले गोड मनधरणी ॥२८॥
अभिमान उत्पन्न होईल या भीतीने तो स्वतंत्र फड म्हणजे संप्रदाय उभारीत नाही ! उपजीविकेची इच्छा धरून लोकांची मनधरणी करण्याकरिता तो गोड बोलत नाही. ।।२८।।
नावडे लौकिक परवडी ।
नावडे लेणीं लुगडी ।
नावडें परान्न गोडी ।
द्रव्या जोडी नावडे ॥२९॥
इतर लोकांसारखी चांगले चांगले कपडे, दागिने त्याला आवडत नाही, पंचपक्वनांची गोडी व धन जोडीही त्याला आवडत नाही. ।।२९।।
नावडे प्रपंच जनीं बैसणे ।
नावडे कोणाचे बोलणे ।
नावडे योग्यता मिरविणें ।
बरवें खाणे नावडे ॥३०॥
त्याला प्रपंची लोकांत बसणे आवडत नाही, त्याला लोकांचे बोलणे रुचत नाही, आपली योग्यता मिरवावी असे त्याला वाटत नाही, किंवा गोड गोड खानेही आवडत नाही. ।।३०।।
नावडे स्रियांत बोलणें ।
नावडे स्रियांते पाहणें ।
नावडे स्रियांचे रगडणें ।
त्यांचा स्पर्श नावडे ॥३१॥
स्रियांमध्ये बसणे आवडत नाही, स्रियांकडे पाहणे आवडत नाही, स्रियांकडून पाय वैगरे चेपून (रगडणे) घेणे आवडत नाही किंवा त्यांच्याकडे त्याला बोलणेही आवडत नाही. ।।३१।।
नको नको स्रियांचा सांगात ।
नको नको स्रियांचा एकांत ।
नको नको स्रियांचा परमार्थ ।
करतीं आघात पुरुषासी ॥३२॥
नको नको ती स्त्रीयांची संगत, नको नको स्त्रीयांचा एकांत, नको नको स्त्रीयांचा परमार्थ, कारण तो पुरुषाला बाधकच होतो. ।।३२।।
म्हणती गृहस्थ साधकें ।
स्रिया सांडुनी जावेकें।
येच अर्थी उत्तर निकें ।
ऐक आतां सांगेन ॥३३॥
हे ऐकून, कोणी म्हणतील, की गृहस्थाश्रमी साधकाने स्त्रीला सोडून द्यावी की काय? ह्या बद्दलचे उत्तर सांगतो ते नीट ऐकावे. ।।३३।।
तरी स्वस्त्रीये वांचुनी ।
नाताळावी अन्य कामिनी ।
कोणे स्रियेसी संनिधवाणी ।
आश्रय झणी न द्यावा ॥३४॥
तशा गृहस्थ साधकाने आपल्या स्त्री वाचून इतर स्रियांना स्पर्श करू नये, इतर स्रियांना आपल्याजवळ बोलण्याचीही संधी देऊ नये. ।।३४।।
स्वस्त्रीसही कार्यापुरते ।
पाचारावें स्पर्शावे निरुतें ।
परी आसक्त होऊ नये तेथें ।
अती सर्वथा न गुंतावे ॥३५॥
स्वस्त्रीकडे सुद्धा कामपूरतेच बोलावे व शिवावे,
पण मनाने तिच्याकडे बिलकुल आसक्त होऊन राहू नये. ।।३५।।
नरनारी सुश्रुषा करिती ।
भक्ती ममता उपजविती ।
तरी त्यांच्या संगती ।
शुध्द परमार्थी न बैसे ॥३६॥
स्त्रीपुरुष मंडळी सुश्रुषा करितात, भक्ती ममता उपजवितात, परंतु जो खराखुरा पारमार्थि असतो तो स्रियांच्या संगतीत बसत नाही. ।।३६।।
अखंड एकांती बैसणें ।
प्रमदा संगे न राहणें ।
जो निसंगी निराभिमानें ।
त्या पैं बैसणें सर्वदा ॥३७॥
तो अखंड एकांतात बसतो, तरुण स्रियांच्या संगतीस राहत नाही, निःसंग व निरभिमान अशा पुरुषांच्या जवळच बसत व वसत (राहत) असतो. ।।३७।।
कुटुंब आहाराकारणें ।
अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे ।
ऐसें स्थिती जें वर्तणें ।
तें जाणणें शुध्द वैराग्या ॥३८॥
कुटुंबाच्या निर्वाहाकरिता अकल्पित काही न मिळाले, तर कोरान्न (कोरडी) भिक्षा मागावयाची, अशा स्थितिने वर्तन करणे, हेच शुद्ध वैराग्य समजावे. ।।३८।।
ऐसी स्तिती नाही ज्यासी ।
कृष्ण प्राप्ती कैंची त्यासी ।
म्हणुनी कृष्णभक्तासी ।
ऐसी स्तिती असावी ।।३९॥
अशी स्थिती जोपर्यंत साधणार नाही, तो पर्यंत त्याला श्रीकृष्ण प्राप्ती कशी होणार ? ह्या करिता श्रीकृष्णभक्ताला अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. ।।३९।।
या स्तितीवेगळा जाण ।
कृष्णीं मिळूं पाहे अज्ञान ।
सकळ मूर्खाचे तो अधिष्ठान ।
लटकें तरी आण देवाची ॥४०॥
अशी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय जो श्रीकृष्ण स्वरूपात मिळून जाऊ म्हणे, तो अज्ञान व मूर्खाचा शिरोमणी समजावा ! हे खोटे वाटेल तर देवाची शपथ घेऊन हे मी सांगत आहे. ।।४०।।
हे बोलणे माझिये मतीचें ।
नव्हेचि गा साचें ।
कृष्णें सांगितलें उध्दवा हिताचें ।
ते मी साचें बोलिलों ॥४१॥
हे बोलणे खरोखर माझ्या मतीचे नव्हे, श्रीकृष्णाने उद्धवाला जो हिताचा उपदेश केला आहे तोच मी सांगितला आहे. ।।४१।।
साच न मानी ज्याचें मन ।
तो विकल्पे न पवे कृष्णचरण ।
माझे काय जाईल जाण ।
मी बोलेन उतराई ॥४२॥
हे ज्याच्या मनाला खरे वाटणार नाही, तो विकल्पामुळे श्रीकृष्णचरणाकडे पोचणार नाही. यात माझे काय जाईल? मी तर सांगून उतराई होत आहे. ।।४२।।
साधावया वैराग्य जाण ।
मनुष्यदेही करावा प्रयत्न ।
सांगे एका जनार्दन ।
आणिक प्रयत्न असे ना ॥४३॥
वैराग्य व ज्ञान साध्य करून घेण्याकरिता मनुष्य देहात येऊन वर सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केला पाहिजे, त्या शिवाय दुसरा उपाय नाही, असे श्रीजनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज सांगत आहेत. ।।४३।।
:-:-:-:-:-:-:-:-:-:चिरंजीवपद समाप्त:-:-:-:-:-:-:-:-:-
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
ReplyDelete